नवी मुंबई। नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे उद्या विविध आरोग्यविषयक सुविधांच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, या कार्यक्रमाचे उद्घाटन वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते होणार आहे. मात्र, या कार्यक्रमाच्या पत्रिकेमध्ये उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
कार्यक्रम पत्रिकेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव वगळण्यात आल्याबाबत खासदार नरेश म्हस्के यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. यासंदर्भात माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, अशा प्रकारे जाणीवपूर्वक नावे वगळली जात असतील तर शिवसेनेचे नगरसेवक त्याला "शिवसेना स्टाईलने" उत्तर देतील.
म्हस्के यांनी नवी मुंबईतील प्रशासन आणि राजकीय कारभारावरही टीका करताना सांगितले की, ज्या पद्धतीने नवी मुंबईचा कारभार सुरू आहे तो योग्य नाही. ठाणे महानगरपालिकेमध्ये भाजप आणि शिवसेना युतीची सत्ता असून, यापूर्वीही शिवसेनेची एकहाती सत्ता राहिली आहे. सध्या युतीचे सरकार असताना सर्व घटक पक्षांच्या मंत्र्यांचा सन्मान राखला गेला पाहिजे आणि कार्यक्रम पत्रिकांमध्ये त्यांची नावे समाविष्ट केली पाहिजेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, कार्यक्रम पत्रिकेवरून निर्माण झालेल्या या वादामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्यात राजकीय कलगीतुरा रंगण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आगामी काळात या प्रकरणावर कोणती भूमिका घेतली जाते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
