नवी मुंबई।
नवी मुंबई महानगरपालिका प्रशासनाने वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या आरोग्य सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. देशभरात तापमानाचा पारा सातत्याने वाढत असून उष्णतेच्या लाटा (Heat Wave) गंभीर स्वरूप धारण करत आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी सर्व विभागांना विशेष खबरदारीच्या सूचना जारी केल्या आहेत.
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (NDMA), भारतीय हवामान विभाग (IMD), केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, कामगार व रोजगार मंत्रालय तसेच महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या अद्ययावत मार्गदर्शक सूचनांनुसार ही उपाययोजना करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य हे उष्णतेच्या धोक्याच्या दृष्टीने देशातील अत्यंत संवेदनशील राज्यांपैकी एक मानले जात असल्याने प्रशासन अधिक सतर्क झाले आहे.
महापालिकेच्या विविध विभागांमध्ये मैदानी काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दुपारी १२ ते ४ या वेळेत शक्यतो उन्हात बाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे. अत्यावश्यक क्षेत्रीय कामे सकाळी ११ पूर्वी किंवा सायंकाळी ४ नंतर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जर अत्यावश्यक कारणास्तव बाहेर जावे लागले तर आवश्यक सुरक्षात्मक उपायांचा अवलंब करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
तसेच कंत्राटी आणि तात्पुरत्या कामगारांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्याच्या सूचना विभाग प्रमुखांना देण्यात आल्या आहेत. कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी भरपूर पाणी पिणे, ORS, लिंबूपाणी, ताक यांसारख्या द्रव पदार्थांचे सेवन करणे, हलक्या रंगाचे सैल आणि सुती कपडे वापरणे, तसेच उन्हात बाहेर पडताना टोपी, रुमाल किंवा छत्रीचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
महापालिकेच्या सर्व कार्यालयांमध्ये थंड पिण्याच्या पाण्याची सुविधा आणि प्राथमिक उपचार व्यवस्था उपलब्ध ठेवण्याचे निर्देशही प्रशासनाने दिले आहेत. चक्कर येणे, डोकेदुखी, मळमळ, अशक्तपणा किंवा अत्याधिक घाम येणे अशी लक्षणे आढळल्यास तात्काळ वैद्यकीय सल्ला घेण्याचे सांगण्यात आले आहे.
याशिवाय, कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्याची प्रकृती बिघडल्यास संबंधित विभाग प्रमुखांनी तातडीने आवश्यक कार्यवाही करावी, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. उष्णतेच्या अॅलर्ट कालावधीत सर्वांनी या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केले आहे.
