नवी मुंबई। वाशी येथील अभ्युदय बँक सिग्नल परिसरात दिव्यांग नागरिकांसाठी देण्यात आलेल्या कियोस्कचा गैरवापर होत असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. संबंधित कियोस्क भाड्याने देऊन त्याचे रूपांतरण करण्यात येत असताना परिसरातील झाडांना नुकसान पोहोचवल्याचा आरोप करण्यात येत आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, झाडांच्या मुळांभोवती कांक्रीट टाकून ती पूर्णपणे बंदिस्त करण्यात आली आहेत. त्यामुळे झाडांच्या मुळांना पाणी आणि हवा मिळत नसून, पुढील काळात झाडे सुकण्याचा धोका निर्माण झाला आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने ही बाब अत्यंत गंभीर मानली जात आहे.
या प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या मधु शंकर यांनी संबंधित प्रशासनाचे लक्ष वेधत तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. दिव्यांगांसाठी राखीव असलेल्या कियोस्कचा नियमबाह्य वापर होत असून, पर्यावरणाचीही हानी केली जात असल्याचे त्यांनी नमूद केले.
तसेच, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी आणि झाडांचे संरक्षण करण्यासाठी तातडीने आवश्यक उपाययोजना राबवाव्यात, अशी ठाम मागणी मधु शंकर यांनी केली आहे.
