नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेत भ्रष्टाचाराविरोधात मोठी कारवाई करत अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड यांना ४२ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले. या कारवाईमुळे महापालिका प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कंत्राटदार दशरथ सुरवसे यांनी ऐरोली विभागात अतिक्रमण हटविण्याचे काम केले होते. या कामाचे बिल मंजूर करण्यासाठी गायकवाड यांनी २१ लाखांच्या बिलावर २ टक्के म्हणजे ४२ हजार रुपये लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे.
याप्रकरणी कंत्राटदाराने एसीबीकडे तक्रार दाखल केल्यानंतर पथकाने सापळा रचत मंगळवारी महापालिकेच्या मुख्यालयातील तिसऱ्या मजल्यावरील कार्यालयात कारवाई केली. यावेळी डॉ. गायकवाड लाच स्वीकारताना रंगेहात जेरबंद करण्यात आले.
ही कारवाई पोलीस उपअधीक्षक धर्मराज सोनके यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत गुप्ततेने पार पडली. या घटनेनंतर महापालिकेतील आर्थिक व्यवहारांच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
सध्या एसीबीकडून प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून या प्रकरणात इतर कोणाचा सहभाग आहे का, याचाही शोध घेतला जात आहे. तर महापालिका प्रशासनाकडून स्वतंत्र चौकशीची शक्यताही व्यक्त होत आहे.
