परवानाधारक दुकानावर कारवाई, तर बेकायदेशीरपणे व्यवसाय करणाऱ्या नारळ विक्रेत्याला संरक्षण
नवी मुंबई ।मुंबईतील एपीएमसी ( APMC ) मसाला मार्केटमध्ये प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एकीकडे मार्केट परिसरात अनेक ठिकाणी बेकायदेशीर व्यवसाय सुरू असल्याचे दिसत असताना, दुसरीकडे निवडक दुकानांवरच कारवाई होत असल्याने प्रशासनाच्या निष्पक्षतेवर संशय व्यक्त केला जात आहे.
ताजे प्रकरण मसाला मार्केटमधील एफ गल्ली परिसरातील आहे. येथे एका परवानाधारक फरसाण दुकानावर फळ विक्री केल्याच्या कारणावरून प्रशासनाने कारवाई केली. मात्र, त्याच दुकानासमोरील दुसऱ्या फरसाण दुकानात उघडपणे नारळ विक्री सुरू असतानाही कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.
व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की, प्रशासन एकाच प्रकारच्या प्रकरणांमध्ये वेगवेगळी भूमिका घेत आहे. त्यामुळे कारवाई नियमांनुसार केली जात आहे की काही दबाव अथवा पक्षपातीपणातून निवडक दुकानदारांना लक्ष्य केले जात आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.
मार्केटमध्ये आधीपासूनच अवैध स्टॉल, अतिक्रमण आणि नियमभंगाच्या प्रकारांमुळे नाराजीचे वातावरण आहे. त्यातच प्रशासनाच्या या कथित दुहेरी भूमिकेमुळे व्यापारी आणि दुकानदारांमध्ये संताप वाढत आहे.
स्थानिक व्यापाऱ्यांनी प्रशासनाने सर्व दुकानदारांसाठी समान नियम लागू करावेत आणि कोणताही भेदभाव न करता निष्पक्ष कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. त्यामुळे बाजारातील पारदर्शकता आणि विश्वास कायम राहील, असे व्यापाऱ्यांचे मत आहे।
