ठाणे जिल्ह्यातील दिवा प्रभाग समिती समोरील शील–दिवा रोड लगत खाडी किनाऱ्यावर मॅंग्रोव्ह नष्ट करून मोठ्या प्रमाणात अवैध बांधकाम केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. ठाणे महानगरपालिका हद्दीत येणाऱ्या या परिसरात मॅंग्रोव्ह क्षेत्राचे मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आले असल्याचे आरोप तक्रारदार यांनी केल आहे .या संदर्भात जुलै 2025 मध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र तक्रारदाराला न कळवता अधिकाऱ्यांनी पाहणी करून चुकीची माहिती दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. तक्रारीनंतरही अवैध बांधकाम सुरूच असून खाडी परिसराचा ऱ्हास होत आहे.मॅंग्रोव्ह नष्ट झाल्यामुळे समुद्री जैवसंपदेवर गंभीर परिणाम होत असून भविष्यात पूर आणि इतर नैसर्गिक आपत्तींचा धोका वाढू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.तक्रारदाराचा आरोप आहे की वारंवार तक्रारी करूनही संबंधित प्रभाग समिती व मॅंग्रोव्ह विभागातील काही अधिकारी आर्थिक फायद्यासाठी या अवैध बांधकामांना संरक्षण देत आहेत. या प्रकरणाशी संबंधित जीपीएस फोटो आणि इतर पुरावे उपलब्ध असल्याची माहितीही देण्यात आली आहे.या अवैध बांधकामाची माहिती बॉम्बे हाय कोर्ट यांनाही देण्यात आली असून प्रकरण गांभीर्याने घेण्यात आले आहे. यावर मुख्यमंत्री यांनी चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच वन विभागाच्या सचिवांनी जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचे निर्देश दिले आहेत.तक्रारदार यांनी अवैध बांधकाम तात्काळ थांबवून संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.सद्यस्थितीत दिवा खाडी किनारी मॅंग्रोव्ह नष्ट करून उभारण्यात आलेल्या घरांवर कारवाईची टांगती तलवार आहे.
